फिनिक्स हॉस्पिटलतर्फे आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर; शेकडो वारकऱ्यांना आरोग्यसेवेचा लाभ
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेची, भक्तीची आणि सेवेची परंपरा जपणारी पवित्र वारी आहे. या वारीत सहभागी होणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सामाजिक बांधिलकीतून राजवीर हेल्थ सर्व्हिसेस प्रा. लि. अंतर्गत फिनिक्स हॉस्पिटल यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये वारकऱ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी, आवश्यक वैद्यकीय सल्ला तसेच प्राथमिक उपचार आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. सलग पायी प्रवासामुळे येणारा थकवा, निर्जलीकरण, सांधेदुखी, ताप, सर्दी, पायांचे विकार यांसारख्या सामान्य आरोग्य समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
शेकडो वारकऱ्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेत फिनिक्स हॉस्पिटलच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा" या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मदत उपलब्ध झाली. २०११ पासून फिनिक्स हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत रुजू आहे आणि वाकड, काळेवाडी, चाकण, हडपसर, खराडी येथे त्यांच्या ब्रांचेसही अविरतपणे काम करत आहेत. इतकंच नाहीतर फिनिक्स हॉस्पिटलचे मॅनेजिंग डिरेक्टर माधव चव्हाण यांचा २१ वर्षांचा गाढा अनुभव असून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत.
यावेळी राजवीर हेल्थ सर्व्हिसेस प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव चव्हाण म्हणाले, "वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अध्यात्माचा अविभाज्य भाग आहे. अनेक वारकरी लांबचा पायी प्रवास करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. याच उद्देशाने फिनिक्स हॉस्पिटलतर्फे हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. भविष्यातही समाजहितासाठी अशा विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल”.
फिनिक्स हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. दीपाली चव्हाण म्हणाल्या, "सेवा, संवेदना आणि समर्पण हीच आमची ओळख आहे. वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. प्रत्येक वारकरी निरोगी राहावा आणि सुरक्षितपणे विठुरायाचे दर्शन घ्यावे, हीच आमची प्रार्थना आहे”.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शासनासह विविध संस्था वारकऱ्यांच्या आरोग्य सुविधांवर विशेष भर देत आहेत. अशा सेवाभावी उपक्रमांमुळे लाखो भाविकांना आवश्यक वैद्यकीय मदत वेळेत उपलब्ध होण्यास हातभार लागतोय.
Comments
Post a Comment